top of page
  • Writer's pictureYogesh Kardile

खेळ ऊर्जेचा. 

Updated: Jul 1, 2021



पदार्थ कोठे संपतो आणि उर्जा कोठे सुरू होते हा एक कालातीत प्रश्न आहे . इतिहासपूर्वकालापासून शिकारी असलेल्या आदिमानवाच्या मनात कुतूहल होते. हीच एक अशी गोष्ट होती जी आपल्याला गुहेतून गगनचुंबी इमारतींपर्यंत घेऊन आली. ती गोष्ट वेगळी आहे कि आपण बऱ्याच गोष्टी गृहीत धरतो. पण जेव्हा जेव्हा आपण निसर्ग सानिध्यात जातो तेव्हा अनेक गोष्टींची उकल अचानक होते.



माझ्या बालपणात विचार सागररहस्य (विचारांच्या समुद्राचे रहस्य) नावाचे एक सुंदर आध्यात्मिक पुस्तक मी ऐकले.

माझे वडील त्यांच्या शिष्यांना या ग्रंथाचा संध्याकाळी पाठ घेत असत. माझ्यासाठी हे आकलन करण्यापलीकडे होते परंतु मी बसून ऐकत असे ते विचार माझ्या मनात कोठेतरी राहिले.पुस्तकातील महत्वाचा केंद्र बिंदू म्हणजे विचारांची तुलना आपल्या मनात येणाऱ्या लाटांसोबत केली. त्या विचारांच्या लहरी आपल्या मनाला आकार देतात. आणि त्याचाच परिणाम आपण आयुष्य त्याप्रमाणे घडवतो.मनातील या लाटा आपल्या भौतिक दृष्टीने दिसत नाहीत कारण त्या समजण्यासाठी आपल्याकडे उपकरणांची कमतरता सध्यातरी आहे. तरीही आपले संपूर्ण भौतिक आणि मानसिक विश्व साकारण्यास कारणीभूत हे विचार तरंगच आहेत. मानव निर्मित प्रत्येक घटना किंवा वस्तू ही त्याच्या स्वतःच्या विचार तरंगांचीच अभिव्यक्ती आहे. असो.



काही दिवसांपूर्वी जेव्हा मी समुद्र किनाऱ्यावर फिरत होतो तेव्हा मला अजस्त्र दगडांचे एकमेकांवर रचलेले ढीग दिसले. अतिशय टोकदार दगड समुद्रावर झुकले होते आणि खालून लाटा त्यांच्यावर जोरात आपटत होत्या. ते पार करून पुढे गेल्यावर नजरेचे पारणे देखावा होता. समुद्रातून आलेले सुळके आणि जेव्हा मी या धारदार खडकांकडे पहिले तेव्हा मला पुन्हा लहान झाल्यासारखे वाटले. चढाई धोकादायक होती पण उत्साह जरा जास्तच होता. यासारखे काहीतरी पाहणे हा एक जादूचा क्षण होता. असे वाटले कि जणू काही एखाद्या वेगळ्याच ग्रहावर फक्त आपणच आलो आहोत आणि अनंत काळापासून या प्रचंड लाटा धरणीवर कोसळत आहेत; माती, झाडे, गवत नष्ट करीत त्या कठोर खडकांना देखील धार लावताहेत. ह्या रौद्रसुंदर देखाव्याला आकार देण्याचे काम या नाजूक पाण्याच्या तरंगांनी केले. मन एकवार म्हणाले येथे घरटे करण्याची हिम्मत फक्त गरुडाचीच.




खडक, वारा, पाणी आणि अगदी सूर्यकिरण टक्कर घेत एकदुसऱ्याला आकार देतात. जणू काही शिव आणि शक्ती यांच्या नृत्याचीच ही जागा. ऊर्जेचे अस्तित्व या सर्वांमध्ये कमी अधिक प्रमाणात आहेच. सर्व विश्वच जणू तरंगमय असल्याचे येथे जाणवले. इतकेच काय तर जो खडक आपल्याला जड भासतो तो देखील या लहरींमध्ये परावर्तीत झाला. सुंदर निसर्गाने मला एकाच वेळी द्वैत तसेच अद्वैत दर्शन घडविले. पण हे सर्व सुरू झाले मनाच्या सागरावरील पहिल्या लहरीपासून.


लिखाण आणि प्रकाशचित्र : योगेश कर्डीले

मॉडेल : रागिणी कर्डीले


91 views1 comment

Recent Posts

See All
bottom of page